जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणूने राज्यातही चांगलाच प्रवेश केला आहे. त्यामुळे सर्वत्र कोरोनामुळे भीतीदायक वातावरण पसरले आहे. राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने संचार बंदीही लागू करण्यात आली आहे.
मुंबईत राज्यातील सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर योग्य तोच उपचार केला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेले संक्रमित ६ रुग्ण बरे झाले आहेत.
त्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपमुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली. यावरून अस स्पष्ट होत की योग्य ते औषध नसले तरी आपण कोरोनावर मात करू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी. काही दिवस स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी घरामध्येच राहावे. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सरकारच्या आदेशांचे पालन करावे.
सद्यस्थितीत राज्यात कोरोनाचे 101 रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक 39 रुग्ण मुंबई आणि परिसरात आहेत. त्यातील दोघांचा १७ मार्च आणि २१ मार्च रोजी मृत्यू झाला तर २३ मार्चला एकाचा मृत्यू झाला. यामध्ये रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे विसरून चालणार नाही. कस्तुरबा रुग्णालयात रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारामुळे 6 रुग्ण बरे झाले आहेत पण ११ ते १४ मार्च दरम्यान जे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. त्यापैकीच हे रुग्ण आहेत.
मात्र सोमवारी राज्यातील एकूण रुग्ण संख्येत आणखी 19 जणांची भर पडली आहे. कोरोना रुग्णांच्या स्वाबच्या (घशातील लाळ) तपासण्या करण्यात येतात. एखाद्या रुग्णाच्या अशा दोन चाचण्या लागोपाठ निगेटिव्ह आल्यास तो रुग्ण बरा झाला, असे समजण्यात येते. अशा लागोपाठ दोन चाचण्या निगेटिव्ह आलेले हे रुग्ण आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार या रुग्णांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
२३ जानेवारीपासून मुंबईत ४ हजारपेक्षा जास्त जणांचा कस्तुरबा आणि इतर रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात तपासण्यात आले. त्यापैकी १ हजार १३८ संशयितांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. कस्तुरबा आणि इतर खासगी रुग्णालयातून आतापर्यंत ९६८ संशयितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत मुंबईमधील २४ आणि मुंबई बाहेरील १२ असे एकूण ३६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबई सह राज्यातील नागरिक कोरोनच्या दहशती खाली आहेत. पण काळजी घेणे हाच सर्वतोपरी एकच उपाय आहे.




0 Comments