सगळे आपले मुंबई मेरी जान म्हणून फिरत असतात, पण मुंबईची जान कोण असा सवाल विचारला, तर मुंबईकर सहजरित्या सांगू शकतो की मुंबईची लोकल. याच लोकलपासून भारतीय रेलपर्यंतचा प्रवास आज आपण पाहणार आहोत, कारणही तस खास आहे. ब्रिटिश काळापासून सुरू झालेली ही भारतीय रेल्वे आजही सुरू असून लोकांच्या मनात आपले स्थान कायम टिकवून आहे.

गरीबाबांपासून श्रीमंतांना प्रवासासाठी खिशाला परवडणारी सगळ्यात स्वस्त प्रवास वाहतूक म्हणजे आपली लोकल ट्रेन. आज मुंबईच्या लोकल ट्रेनसाठी महत्वाचा दिवस आहे. वंटास मुंबईची टीमदेखील याच लोकलने प्रवास करत मुंबईच्या कानाकोपऱ्यातील विशेष गोष्टी तुमच्यपर्यंत देत असतात; मग आजचा दिवस आमच्यासाठीही खास.

कोरोना संकटामुळे आपण सण उत्सव घरी बसून साजरे करत आहोत. आजचा दिवस विशेष का आहे? आणि ते पण आपल्या लोकल ट्रेनसाठी? पाहुयात सविस्तर...

भारतीय रेल्वेसाठी आजचा दिवस विशेष
16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर म्हणजेच आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे या मार्गावर भारतातील पहिली प्रवासी रेल्वे धावली. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेतर्फे (आताची सेन्ट्रल रेल्वे) ही सेवा सुरू करण्यात आली होती.

दुपारी 3.30 वाजता पहिली भारतीय रेल्वे CSMT वरुन सुटली आणि सुमारे 45 मिनिटांत ती ठाण्याला पोहोचली होती. 

जेव्हा रेल्वे सेवा सुरू झाली तेव्हा, त्या रेल्वे गाडीला 14 डबे होते. वाफेच्या साहिब, सिंध आणि सुलतान या तीन इंजिनांच्या साह्याने रेल्वे चालविण्यात आली होती. बदलत्या काळात आज रेल्वे 12 डब्यांवर धावते. पहिल्या दिवशी 400 जणांनी CSMT ते ठाणे असा 34 किलोमीटर चा प्रवास केला होता. जगन्नाथ शंकरशेठ आणि जमशेटजी जिजीभाई हे या रेल्वेचे संचालक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही पहिली रेल्वे धावली. 

आज रेल्वेसाठी विशेष दिवस असूनदेखील, आतापर्यंतच्या भारतीय रेल्वेच्या सफरमध्ये पहिल्यांदाच रेल्वे बंद आहे. रेल्वेतून प्रवास करण्याऱ्या प्रवाशांची संख्या पाहता लॉकडाऊनमध्ये सरकारने रेल्वे सेवा 23 मार्चपासून ते 3 मार्च (पुढील सूचना येईपर्यंत) बंद ठेवण्यात आली आहे.

एवढ्या वेळेसाठी रेल्वे सेवा बंद राहण्याची 167 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. जागतिक महायुद्ध असो, मुंबईत रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोट असो, 1974 साली झालेला रेल्वे कर्मचाऱ्यांचा मोठा संप, तसेच पूर अथवा अन्य कोणतीही दुर्घटना व नैसर्गिक आपत्ती असो रेल्वे वाहतूक कधीही बंद पडली नव्हती, मात्र यावेळेस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सेवा बंद करण्यात आली. 

मालगाडीद्वारे लॉकडाऊन मध्येही भारतीय रेल्वे सेवा कामासाठी तत्पर
रेल्वे सेवा कोरोनामुळे बंद ठेवण्यात आली आहे. पण मालगाडीच्या रुपात रेल्वे कामासाठी तत्पर आहे. लॉकडाऊन च्या काळात ५०७ मालगाड्या 65 मार्गांवर धावल्या असून, लॉकडाउनच्या कालावधीत भारतीय रेल्वेने आतापर्यंत 20 हजार 400 टन एवढ्या जीवनावश्यक साहित्याची वाहतूक केली आहे. एवढेच नव्हे, तर रेल्वेची उत्पादन केंद्रे, वर्कशॉप्स आणि फिल्ड युनिट्समध्ये PPE किट्सची निर्मितीही केली जाणार आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मदत होणार आहे. एप्रिल महिन्यात किमान 30 हजार, तर मे महिन्यात 1 लाख पीपीई किट्सच्या निर्मितीचे उद्दिष्ट भारतीय रेल्वेने ठेवले आहे. म्हणजे या ना त्या मार्गाने भारतीय रेल्वे देशवासीयांना सेवा देतच आहे.