काही दिवसांपुर्वीच देशात अम्फान वादळाने धुमाकुळ घातला होता, त्याचं भय संपतय न संपतय, लगेच गुजरात, मुंबई, दादरा, नगर हवेली, दमण-दीव अशा राज्य, प्रदेश आणि यांच्या शेजारी असेलेल्या भागांमध्ये आणखी एका मोठ्या वादळाचा प्रवेश होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हा संपुर्ण लेख केंद्रिय हवामान खात्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आहे.
जिथे या वादळाची शक्यता आहे, तिथे मदतीला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (एनडीआरएफ), भारत हवामान विभाग (आयएमडी) ही तीन दले उपस्थित आहेत. महाराष्ट्रात एनडीआरएफच्या 16 टीम दाखल झाल्या आहेत, त्यातीत 7 टीम राखीव असतील. गुजरातमध्ये 13 टीम दाखल झाल्या आहेत, त्यातील 2 टीन राखीव असतील. बाकी इतर प्रदेशांमध्ये प्रत्येकी एक टीम दाखल करण्यात आली आहे.
हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे. हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे बनते. हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला इंग्लिश भाषेत सायक्लॉन, अटलांटिकमध्ये होणाऱ्याला वादळाला हरिकेन, आणि पॅसिफिक महासागरातील वादळाला टायफून ह्या नावाने ओळखले जाते.
वादळ निर्माण होण्याचं कारण काय?
पावसाळी सीजन आपल्याकडे सुरू झालाय, केरळपासून मान्सूनला सुरूवात झाली आहे. (हा मान्सून महाराष्ट्रात येण्यास 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागतो.) आपण एक गोष्ट ऐकली असेल की आरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, याचा अर्थ असा की त्या ठिकाणी थंड हवा निर्माण झाली आहे, बाष्पाचे म्हणजे पावसाचे प्रमाण जास्त होते, तिथे वादळे निर्माण होतात आणि ती उष्ण, दमट वातावरण, कोरडी हवा, जिथे पाऊस कमी आहे त्याठिकाणाकडे वाहू लागतात.
महाराष्ट्राला धोका जास्त का?
सध्या महाराष्ट्रात वर उल्लेख केल्याप्रमाणे वातावरण आहे. महाराष्ट्रात अजूनही उष्ण दमट हवा आहे, पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे त्या वादळाचा धोका महाराष्ट्राला जास्त आहे, असंदेखील म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यावर निर्माण होणाऱ्या निसर्ग वादळाचं रुपांतर समुद्राच्या काठी येईपर्यंत चक्री वादळात होणार आहे. या वादळाचा केंद्रबिंदू आरबी समुद्र असल्याने आरबी समुद्राच्या शेजारी असलेल्या भागांना याचा मोठा धोका आहे. त्यात मुंबई किनारपट्टी, वसई, विरार, पालघर, ठाणे, कोकण किनारपट्टी, रायगड, रत्नागिरी या भागांना सर्वाधिक धोका असणार आहे.
कसं असेल वादळ?
आरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तिथे निसर्ग वादळ निर्माण झालं आहे. परिस्थिती तशीच राहिली तर आज (2 जून रोजी) संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत चक्री वादळात आणि रात्री 11.30 वाजेपर्यंत त्याचं तिव्र चक्रीवादळात रुपांतर होईल. हे वादळ हळू हळू उत्तरेकडे म्हणजेच रायगड ते मुंबई अशा पट्ट्याकडे नंतर इशान्य म्हणजे गुजरातकडे वळेल.
उद्या (3 जून) पहाटे हे वादळ रायगडच्या हरिहरेश्वर आणि दमण दरम्यानच्या पट्ट्या प्रवेश करेल, त्यानंतर लगेचच ते मुंबईकडे पसरत जाईल.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 120 किमी प्रति तास असा या वादळाचा वेग आहे, म्हणजे एका रेसर कारच्या वेगापेक्षा काहीसं कमी.
या वादळात फक्त समुद्राचाच फटका नाही, तर अशा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊसदेखील पडण्याचा मोठा अंदाज आहे. हा पाऊस वादळामुळे आलेला असेल तो मान्सूनचा पाऊस नसेल हेही नागरिकांनी लक्षात घ्यावं.
या वादळाचा वेग आज (2 जून रोजी) संध्याकाळी 5.30 नंतर 80 ते 90 किलोमीटर प्रतितास असेल, त्यानंतर त्याचा वेग हळू हळू वाढेल आणि उद्या (3 जून रोजी) पहाटेच्या वेळी 125 किमी प्रतितास इतक्या वेगाने हे वादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धडकेल.
3 जून रोजी दिवसभर या वेगाची तिव्रता कायम असेल, रात्री 11.30 नंतर हळू हळू या वेगाची तिव्रता कमी होईल आणि त्याचा वेग ताशी 80 ते 90 किमी होईल, त्यानंतर 4 जून रोजी दुपारपर्यंत याच वेगाची मर्यादा 45 ते 35 किमी प्रतितास इतकी होईल आणि काही तासात या वादळाचं रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात होईल.
या सगळ्यात वित्त आणि जिवीत हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह गुजरातलाही हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि अशा वंटास पोस्टसाठी आमच्या सोशल मिडीयाल नक्की भेट द्या. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा कारण आपल्यावर येत्या काही दिवसात कोरोनासह अनेक संकटावर मात करायची आहे.
हेही वाचाच...


0 Comments