"मंगल देशा, पवित्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा"आपण १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करत असतो. तसेच १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो. विविध संस्कृती, बोलीभाषा, परंपरेने नटलेला आपला महाराष्ट्र हा नेहमीच भारतात एक आपली वेगळीकता निर्माण करतो. आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो, पण त्यामागे काय कारण आहे हे देखील जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे खास महाराष्ट्र दिनी वंटास मुंबई आपल्या वाचकांसाठी महाराष्ट्र दिनाचा इतिहास पुन्हा स्मरणात आणून देत आहे.
का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन
1956 च्या States Re-organisation Act नुसार भारतातील राज्यांच्या सीमा या भाषेच्या आधारे निर्धारित करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, संत-महात्मा तसेच ही मराठी भाषिकांची भूमी मानली जाते. त्यांनतर संयुक्त महाराष्ट्र समितीकडून मुंबईसह वेगळ्या महाराष्ट्राची मागणी करण्यात आली. ज्यामध्ये मराठी, कोकणी भाषिकांचा समावेश असेल तर, गुजराती आणि कच्छी भाषिक जनतेसाठी वेगळ्या राज्याची मागणी करण्यात आली. याच मागण्या आणि आंदोलनाच्या बळावर अखेर १ मे 1960 मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली म्हणूनच महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 105 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
महाराष्ट्र राज्यासाठी कसा झाला होता संघर्ष
21 नोव्हेंबर 1956 ची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचं वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. या निर्णयाचा सर्वच स्तरांतून आणि अनेक लहानमोठ्या सभांमधून जळजळीत निषेध करण्यात येत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगारांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपारनंतर, म्हणजेच मुंबईतल्या शंभर- सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली ड्युटी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चे निघाले. परिस्थिती लक्षात घेऊन फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी करण्यात आली होती. कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आलं होतं. पण, जमावबंदीला झुगारून मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यांना उधळून लावण्यासाठी लाठीमारही करण्यात आला. पण, तरीही ते चौकातून हटत नव्हते. अखेर पोलिसांना त्यांच्यावर गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना “दिसताचक्षणी गोळ्या” घालण्याचे आदेश देण्यात आले. परिणामी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या सळ्या रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी 1957 पर्यंत जे 105 आंदोलक हुतात्मे झाले, महाराष्ट्रासाठी झगडलेली ही सुरुवात होती आणि कोणत्याही परिस्थितीत कामगार माघार घेण्यास तयार नव्हते. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला अखेर माघार घ्यावी लागली आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना करावी लागली.
त्या 105 हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आज आपला महाराष्ट्र एक वेगळे आणि विकसित राज्य म्हणून ओळखले जाते. ज्याला मुंबईसारख्या आर्थिक राजधानीची साथ मिळाली. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा त्यावेळी 4 प्रमुख भाग व 26 जिल्हे महाराष्ट्रात होते.


0 Comments